पुणे : “अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. असा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसा या तत्वाचीही हेटाळणी केली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात मी सावरकर वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. मात्र शरद पोक्षेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान या कार्यक्रमापूर्वी काही पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या पोक्षेंचा जाहीर निषेध असे पोस्टर झळकावले. त्यामुळे प्रस्तावित कार्यक्रम स्थळी गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.पण शरद पोंक्षे यांनी कार्यक्रम ठिकाणी हजेरी लावली आणि अखेर कार्यक्रम सुरू झाला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीची भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यथित करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्र पुरुषांपेक्षा सावरकर काकणभर श्रेष्ठ” असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची वाट कशाला पाहायची. महात्मा गांधी, महात्मा फुले यांना महात्मा उपाधी सरकारने दिली होती का, सावरकरांना स्वातंत्र्य ही उपाधी सरकारने दिली होती का. त्यामुळे आता आपण भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशीच सुरुवात करायची. यामुळे भारतरत्न पुरस्काराचा सन्मान होईल”, असंही शरद पोंक्षे यावेळी म्हणाले.
“राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत त्यांना दिल्लीत वेडा मुलगा म्हणत हेटाळणी केली. दिल्लीतील वेडा मुलगा काहीतरी बडबड करत असून मी त्याचे आभार मानतो. हिंदू फार थंड असून पेटायला वेळ लागतो. ब्रिटिशांप्रमाणेच आजही सावरकर यांची भीती आणि दहशत आहे. त्या वेड्या मुलाने असंच बोलत राहावे, मात्र त्याला त्याच्या आजीचा इतिहास माहित नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी सावरकर यांच्या स्मारकाला निधी दिला. त्याचबरोबर पोस्टाच्या तिकिटावर सावरकरांचे छायाचित्रे प्रसिद्ध केले होते”, असं शरद पोंक्षे यांनी सांगितलं.


