नागपूर: कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा केव्हा दाखल करणार, असा प्रश्न इंदोरा मैदानावर आयोजित निषेध सभेत उपस्थित करण्यात आला. भीमा-कोरेगाव आंबेडकर जनआंदोलन कृती समितीने या निषेध सभेचे आयोजन केले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हरिदास टेंभुर्णे होते.
रिपब्लिकन ऐक्य असते तर असे कृत्य करण्याचे कुणालाही धाडस झाले नसते, असे सांगत, सोबत येतील त्यांना घ्यावे, असे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी नोंदविले. हल्ल्यातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी त्यांनी केली. कोरेगाव-भीमा येथील हल्ल्याविरोधात संपूर्ण राज्यात सभा होत असल्याकडे लक्ष वेधत आजही या देशातून ब्राह्मणवाद, जातीवाद संपला नाही. २८ फेब्रुवारीला मुंबईत चैत्यभूमी येथून निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चात आंबेडकरवाद्यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.


