मुंबई : चीन, इटली फ्रान्स, इराण नंतर भारतातही कोरोनाने शिरकाव करत थैमान घालायला सुरवात केली आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या पाचशेपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्रसरकार आणि देशातील प्रत्येक राज्यसरकार अहोरात्र झडत आहेत. या राज्य सरकारला मदत करण्यासाठी अनेक सेलिब्रेटी तसंच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये अनेक मोठ्या उद्योजकांचाही समावेश आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजने मदतीसाठी पुढाकार घेत मुंबईत विशेष रुग्णालय सुरू केलं आहे.
करोनाच्या पार्श्वभुमीवर देशात प्रथमच हे पाऊल उचललं गेलं आहे. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र १०० बेड्सची सुविधा करण्यात आली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता केवळ दोन आठवडय़ांत हे रुग्णालय सुसज्ज करण्यात आले आहे. समूहाच्या रिलायन्स फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे ही मदत करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील लोधिवली येथील रुग्णालयात विलगीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर रिलायन्स लाइफ सायन्सेसमध्ये चाचणी सुविधा आहे.
त्याचप्रमाणे, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने महाराष्टाच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनमार्फत विविध शहरांमध्ये गरजूंना मोफत जेवण पुरवले जाणार आहे. याशिवाय रुग्णांसाठी दिवसाला एक लाख मास्क बनविण्यापर्यंतची क्षमताही वाढविली आहे. करोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व आपत्कालीन सेवा वाहनांसाठी मोफत इंधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवसाला एक लाख मास्क तयार करण्यापर्यंतची क्षमता वाढविली आहे. समूहाच्या विविध कंपन्या, विभागात कार्यरत असलेले कंत्राटी तसेच तात्पुरते कर्मचाऱ्यांना नियमित वेतन दिले जाईल, असे रिलायन्सने स्पष्ट केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

