कोल्हापूर : राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. दूध खरेदी दरामध्ये वाढ व्हावी या मागणीसाठी भाजपनंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगलीत आज दूधाचे टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले तर काही ठिकाणी दुधाचा अभिषेक करण्यात आला.
दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोसळलेल्या दुधाच्या दरांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक शेतकरी संघटनांनी दूध दरवाढीसाठी तीव्र आंदोलन छेडलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कोल्हापूरमध्ये शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन केंद्र आणि राज्य सरकारला सुबुद्धी देण्याचं साकडं घातलं. तसेच अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास समजून घ्या. 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च असणाऱ्या दुधाला पाण्यापेक्षाही कमी किंमत मिळत आहे, असं मत व्यक्त केलं.
शेतकऱ्यांना प्रतिलीटर दुधाला 30 ते 35 रुपये उत्पादन खर्च येतो. आज पिण्याच्या पाण्यालाही प्रतिलीटर 20 रुपये मिळतात. मात्र, दुधाला 17-18 रुपये दिले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. त्यामुळे अमृतासारखं दूध जमिनीवर ओतून देताना होणारा त्रास लक्षात घ्या. कर्जबाजारी होऊन मरण येणार असेल, तर सोशल डिस्टन्सिंग कशाला?” अस राजू शेट्टी म्हणाले आहेत.
“पाण्यापेक्षा या अमृताला कमी भाव दिला जातोय. आमच्या आया-बहिणी राबराब राबतात. शेणामुतात हात घालून काम करतात. त्या माऊलींच्या भावनांची किंमत नाही का? बाटलीबंद पाण्याला 20 रुपये आणि दुधाला 17 रुपये दर मिळतोय. मग आंदोलकांनी दूध ओतलं तर त्याला नासाडी का म्हणायचं? हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवशी पवित्र मनाने आंदोलन हाती घेतोय. शेतकऱ्यांना न्याय मिळेल ही आशा आहे,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
दुध दरवाढीसाठी स्वभिमानीचे आक्रमक आंदोलन
शंकर भगवानाला दुग्धाभिषेक करुन राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी देण्याचे साकडे घातले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला केवळ 17-18 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे रस्त्यावर दूध ओतताना शेतकऱ्यांना होणारा त्रास समजून घ्या, असंही आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.
शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच आंदोलन सुरू केले. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावर येलूर फाटा येथे दुधाचा टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतले, तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दूध संघांची वाहने अडवून दूध रस्त्यावर ओतण्यात आले.
राज्यात गाईच्या दुधाला सध्या प्रतिलिटर १६ ते २० रुपये दर मिळत आहे. हा दर खूपच कमी असल्याने सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. देशांतर्गत दूध दर नियंत्रित राहण्यासाठी दूध पावडरीची आयात बंद करावी, तसेच दूध पावडर निर्यातीला चालना मिळावी, अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. स्वाभिमानीचे आंदोलन होण्यापूर्वीच सोमवारी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलन करुन दूध दराचा मुद्दा उपस्थित केला. राज्य सरकारने याकडे लक्ष न दिल्याने हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
दूध दर आंदोलन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना छावा संघटनेनं ठेवलं दुधात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

