मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योगधंदे आज बंद आहेत. त्यामुळे राज्याला येणाऱ्या महुसालातही लक्षणीय घट झाली आहे. यासाठी आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील 25 हजार कंपन्यांचे उत्पादन सुरु केले आहे. याबाबतची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
ते म्हणाले की, कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. राज्यावरदेखील याचा विपरित परिणाम झाला आहे. असे असले तरी उद्योग विभागाने ठोस पावलं उचलल्याने उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येत आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात 57,745 उद्योगांना परवाने दिले असून 25 हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख कामगार काम करत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात 9 हजार 147 कारखान्यांना परवाने दिले आहेत. त्यापैकी 5774 कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये आज उद्योगमंत्री सुभाष देसाई ही माहिती दिली.
स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, असे देसाई यांनी सांगितले.
राज्यातील लघु उद्योगांना सावण्यासाठी केंद्र शासन लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासंबधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी दैनंदिन चर्चा सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.


