टीम महाराष्ट्र देशा – येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सगळीकडे चालू आहे. त्यातच मोदींनीही महाराष्ट्रातील वर्धा येथून विरोधकांवर जोरदार टोलेबाजी करत प्रचार सभेला सुरुवात केली. ही प्रचार सभा महाराष्ट्रातील पहिलीच प्रचार सभा होती. यावेळी मोदींनी विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली असून शरद पवार यांना विशेष लक्ष केले होते.
आता पुढील प्रचार सभेत मोदींचे लक्ष राज ठाकरे असणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे कारण असे की आता लवकरच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आमने सामने येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुढील प्रचारसभा ही नांदेडमध्ये असणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. पण याच दिवशी दुसरीकडे मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे भाषण करणार आहेत. त्यावेळी ते नरेंद्र मोदींवर घणाघात करणार असल्याचं सांगण्यात आहे.
त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी सुरू असलेल्या या प्रचाराच्या आखाड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे हे दोन्ही लोकप्रिय नेते आणि उत्तम वक्ते आहेत. त्यामुळे दोन्हीही सभांकडे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष असणार आहे.
आतापर्यंत झालेल्या अनेक भाषणांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे येणाऱ्या सभेत ते काय बोलणार? तसेच काल वर्ध्या येथे झालेल्या प्रचार सभेत मोदींनी पवारांवर बोचरी टीका केली त्यामुळे आता ते राज ठाकरेंवर काय टीका करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


