बुलडाणा : सध्या जगभरात कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली आहे. दरम्यान देशात आणि राज्यात कोरोनाची प्रचंड धास्ती वाढली आहे. कोरोनाच्या धाकाने नागरिकांनी चिकनकडे पाठ फिरविली आहे. वास्तविक चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे देशभरातील पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे.
कोरोनाच्या भितीपोटी देशातील पोल्ट्री उद्योग पूर्णपणे रसातळाला गेला आहे. राज्यासह बुलडाणा जिल्ह्यातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. या संकटकाळी शासनाने पोल्ट्रीधारकांना अनुदान स्वरुपात मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ज्याप्रमाणे एखादी आपत्ती येते त्यावेळी बाधीतांना सरकारद्वारे मदत केली जाते. त्याच धर्तीवर पोल्ट्री व्यवसायावर आलेली ही आपत्ती पाहता शासनाने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शिवाय ट्विट करुनही त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातील मागणी केली आहे.
कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. कुक्कुट पालन व्यवसायात साधारणत: प्रतिकिलो उत्पादन तयार करण्यासाठी किमान 70 रुपयांहून अधिक खर्च येतो आणि सध्या कोंबड्या फुकट घेउन जा, अशी परिस्थिती पोल्ट्री धारकांची झाली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योग पुरता रसातळाला गेला आहे.
सरकारद्वारे जर कुक्कुट पालक व्यावसायिकांना लवकर मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात कुक्कुट पालक व्यावसायिकांच्या आत्महत्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन संकटात सापडलेल्या कुक्कुट पालन व्यावसायिकांना तत्काळ अनुदान स्वरुपी मदत द्यावी, अन्यथा कोंबड्या जिल्हाधिकारी कार्यालयात , असा इशाराही स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.


