🕒 1 min read
पुणे : राज्यसरकारने नऊ एप्रिल रोजी केशरी रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केशरी रेशन कार्डधारकांना एक मेपासून स्वस्त धान्य दुकानांतून धान्यवाटप केले जाणार आहे. ऑनलाइनमधून वगळल्या गेलेल्या किंवा ऑनलाइन नोंदणी नसलेल्या केशरी रेशनकार्डधारकांना मे आणि जून या दोन महिन्यांचे धान्य एक मे पासून वितरित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. लाभार्थी नागरिकांना आठ रुपये प्रति किलो दराने गहू आणि १२ रुपये प्रति किलोने तांदूळ याप्रमाणे प्रति व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळू शकणार आहे. दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून ई-पॉस मशीनद्वारे तांदळाचे वितरण करायचे आहे. केशरी रेशन कार्डधारकांना वितरण करण्यात येणाऱ्या धान्याची नोंद नोंदवहीत घेऊन लाथार्थ्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘प्राधान्य कुटुंब लाभार्थी गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना ३५ किलो धान्य हे दोन रुपये प्रति किलो दराने गहू आणि तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ८४ टक्के शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पात्र रेशन कार्डधारकांना एप्रिल ते जून या कालावधासाठी नियमित अन्नधान्याशिवाय प्रतिसदस्य पाच किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
