मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनचा फटका सगळ्या घटकांना बसला आहे. ग्राहक नसल्याने आणि व्यापारी जवळ करत नसल्याने मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी देखील चिंतेत आहे.
शेतकरी वर्गाला लॉकडाऊनचा फटका मोठ्या प्रमाणात बसला असून आता पुढील काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार टनांपर्यंत वाढवा, अशी केंद्राकडे मागणी केली आहे.
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने गेल्यावर्षी ‘प्राईस् स्टॅबिलायझेशन फंड’ योजनेंतर्गत नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 45 हजार मेट्रीक टन कांदा खरेदी केला होता. त्या बफर स्टॉकमुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करुन देणे सरकारला शक्य झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, यावर्षी झालेले कांद्याचे जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदाखरेदीसाठी यावर्षी निश्चित केलेली 40 हजार मेट्रीक टनांची मर्यादा वाढवून 50 टनांपर्यंत वाढवण्यात यावी आणि महाराष्ट्रातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा द्यावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
त्या पार्श्वभूमीवर,यंदा झालेलं कांद्याचं जादा उत्पादन, वाढलेली आवक, कोरोनामुळे ठप्प असलेला उठाव या बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी यंदा निश्चित केलेली ४० हजार मेट्रिक टनांची मर्यादा वाढवून ५० हजार टनांपर्यंत करावी आणि शेतकरी व ग्राहकांना दिलासा द्यावा.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 6, 2020
दरम्यान, ट्विटर अकाऊँटवरुन कांद्याबाबत माहिती देताना, भविष्यात कांद्याचे भाव गडगडणार असल्याची शक्यता आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजारात आजमितीला कांदा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे त्याला उठाव नाही. अनुकूल वातावरणामुळे रब्बी हंगामातही कांद्याचं उत्पादन वाढणार आहे. तो कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याचे भाव गडगडण्याची आणि त्यातून शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.


