🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे राज्यातील अनेक उत्सवांवर विरजण पडणार असल्याचं दिसत आहे. त्यापैकीचं एक म्हणजे गणेशोत्सव. राज्यात गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. मुंबई – पुण्यातील गणेशोत्सवाचा थाट हा काही औरचं असतो. मात्र यंदाचा गणेशोत्सव हा काहीसा रुखा सुखा जाणार असल्याचं दिसत आहे.
याचं पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांना काही सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी यंदा गणेशोत्सव साजरा होणार असून तो साधेपणाने होणार आहे. सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आहे. हे संकट गणेशोत्सव पर्यंत कमी होईल अशी आशा सर्वांनाचं आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा होईल, असे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सांगण्यात येत आहे.
याबबत समितेचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर म्हणाले की, सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा. पण गणेशोत्सव दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न करता अत्यंत साधेपणाने करा. कारण कोरोनानंतरही आपल्यापैकी प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचं आहे.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसंच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत, असेही नरेंद्र दहीबावकर म्हणाले.
दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणारा पालखी सोहळ्याबाबतही अनिश्चितता आहे. राज्य सरकारने आषाढी वारीच्या नियोजनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून होत आहे. महाराष्ट्रात अनेक संतांच्या पालख्या या आषाढी एकादशी निमित्त पायी चालत पंढरपूरकडे जात असतात. ही महाराष्ट्राची मोठी परंपरा असून यामध्ये अनेकजण सहभागी होतात. मात्र यंदा कोरोनाचे जीवघेणे संकट असल्याने पालखीच्या नियोजनाबाबत शासनाने यावर स्पष्टता द्यावी अशी मागणी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंशपरंपरागत चोपदार रामभाऊ चोपदार यांनी केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

