Share

माढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य कार्यकर्त्याची भावना

Published On: 

सोलापूर : कधीकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समाजाला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या पक्षात गटबाजीने काहूर माजवले आहे. पक्ष विरोधात गटबाजी करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातवरण आहे. अशातच आता खा. विजयसिंह मोहिते पाटील यांना डावलून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना माढ्यातून उमेदवारी दिली अजणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

दरम्यान, शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या पक्षामधील गटबाजीने नाराजीचे वातावरण पहायला मिळत आहे. अशाच एका सामान्य कार्यकर्त्याने व्यक्त केलेली शब्दरूपी भावना.

आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांची देशाला व महाराष्ट्राला गरज असताना आज कुठेतरी गटबाजीमुळे पक्षाचे फार मोठे नुकसान होत आहे.

पवार साहेबांचे आचार विचार व अभ्यास हा राजकारणापलिकडचा आहे , त्यांना शेतकरी , शेतमजूर, आदिवासी, दलित, मुस्लीम, इतर मागासवर्गीय बांधवयांच्या समस्यांची जाणीव तर आहेच मात्र त्या सोडवण्याची धमकसुद्धा आहे , देशाचा व राज्यांचा विकास व्हायचा असेल औद्योगिकरणा बरोबर, लघू उद्योग, व सहकार सुद्धा वाढला पाहिजे व शेतीसुद्धा समृद्ध व आधुनिक झाली पाहिजे हे फक्त पवार साहेबच जाणतात, त्यांनी क्रिडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा खूप मोठे काम केले आहे . फळबागा, शेततळी , ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकर्यांना देऊन शेतकर्यांना प्रवाहात आणायचे काम साहेबांनीच केले आहे .

पण हे करत असताना पक्षातील गटबाजीकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले नाही . . होय मि पवार साहेबांवर मनापासून प्रेम करणारा कार्यकर्ता म्हणून ही खंत व्यक्त करतोय.

एकेकाळी सोलापुर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध होता , बहुतांश तालुका पंचायती व जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती याचे कारण सोलापूर राष्ट्रवादीची संपुर्ण धुरा आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर होती व त्यामुळे किरकोळ मतभेद मिटवून विजयदादा सर्वांनाच बरोबर घेऊन जिल्ह्याचा कारभार हाकत होते , सहकारात, जिल्हा बँकेत तर दादासाहेबांनी सर्वच पक्षातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण विरहीत काम केले .

पवार साहेबांनी राष्ट्रवादीची निर्मिती करताच विजदादांनी , विजयदादांना मानणारा संपुर्ण गट साहेबांच्या नेतृत्वावर मनापासून प्रेम करत राष्ट्रवादी मध्ये आणला व साहेबांच्या पाठिमागे स्वतःची संपुर्ण ताकद उभी केली , स्वतःची दावेदारी असताना देखील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय आर आर पाटील साहेब असतील यांच्या साठी साहेबांच्या शब्दा खातर उपमुख्यमंत्री पदाचा त्याग केला.

विजयदादांनी कायम पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले 

आदरणीय पवार साहेबांना २००९ ला आग्रहाने माढा लोकसभेला उभे रहायला सांगुन तन मन धनाने काम करून विक्रमी मताधिक्य दिले , विजयदादांनी कितीही, काहीही झाले तरी पवार साहेबांवरील निष्ठा व प्रेम ढळू दिले नाही. दादांना
पक्षाने जिथे जिथे संधी दिली त्या संधीचे सोने करून,दादांनी जनतेची अविरतपणे सेवा केली, मतदारसंघात तर विकास कामाचा डोंगर उभा केलाच पण विविध खात्यांचा कारभार करत असताना , चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिल्प सृष्टी , नायगावला माता सावित्री बाई शिल्प सृष्टी , सरसेनापती बाजी हंबीरराव मोहिते यांची समाधी , अण्णाभाऊ साठे स्मारक, अरण येथील संत सावतामाळी यांच्या जन्म स्थाळा भरीव निधी दिला, ग्राम पंचायत कर्मचारी यांनाही शासकीय सेवत सहभागी करून घेतले व बढतीमध्ये आरक्षण लागू केले ,हे करत असतानाच पक्ष वाढीसाठी सदैव ताकद पणाला लावली, याउलट मोहिते पाटीलांना पक्षांतर्गत जे विरोधक तयार झाले त्यांनी नेहमीच पक्ष विरोधात काम केले, राष्ट्रवादीत मोठे झालेलेच पक्षावर उलटले.  इथेच काय? संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाने मोठे केलेले लोक राजकारणाची हवा बदलताच कुणी भाजपाच्या तर कुणी शिवसेनेच्या वळचणीला गेले पक्षालाच आव्हान देऊ लागले आणि राष्ट्रवादीलाच संपवण्याची भाषा करू राहिले पण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील हे सदैव पक्षा बरोबर एकनिष्ठ राहिलेले दिसून येतात.

सोलापुर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे पुर्णपणे बहुमत असताना सुद्धा , एकदा सभापती पदाच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री बाबाराजे देशमुख यांचा पराभव राष्ट्रवादीतील मोहिते पाटील विरोधी गटाने घडवून आणला, विधान परिषदेला राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव याच गटबाजीतून झाला , जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीचा होत असताना राष्ट्रवादीच्याच काही लोकांनी तो अपक्ष व भाजपाच्या विचारांचा केला गेला. तरीदेखील पक्षाने काहीच कारवाई केली नाही , त्यामुळे गटबाजी वाढत गेली. बीड मध्ये सुरेश धसांनी पक्षाशी गद्दारी करताच त्यांना व त्यांच्या समर्थक गद्दारांना पक्षाने बडतर्फ केले नगर मध्ये सुद्धा पक्षाने गद्दारी करणार्या सर्वच नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी केली.

पक्षाच्या जीवावर मोठे झालेले कुणीही असो त्याला पक्ष भिक घालत नाही हाच धडा दिला गेला. मात्र सोलापूर जिल्ह्यात साहेबांनी मनापासून गटबाजीकडे लक्ष दिले असे वाटत नाही , याचीच खंत वाटते , आज देशात व राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता यायची असेल तर लोकसभा व विधानसभेची एक एक जागा महत्वाची आहे व जागा जिंकायच्या असतील तर पक्षांतर्गत गटबाजीला बिलकुल स्थान असता कामा नये हीच आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्यांची अपेक्षा आहे .

मात्र, सोलापुरात काही लोकांकडून विजयसिंह मोहिते पाटील साहेबांचे पंख छाटण्याच्या नादात पक्षालाच आव्हान दिले जातेय व यातून पक्षालाच ओहोटी लागत आहे याचा तरी आदरणीय पवार साहेबांनी विचार करायला हवा . नव्यानेच पक्षात सहभागी झालेले , जनतेची नस माहिती नसलेले सुद्धा आज उमेदवारी मागत आहेत पण पक्षाची पडत्या काळात पडझड थांबवलेले दादासाहेब काही ठराविक लोकांना नको आहेत, मात्र जनतेत दादासाहेबांवर किती प्रेम आहे हे गावागावात फिरले कि दिसून येते.

जनतेची कसलीच कामे न केलेले जनसंपर्क नसलेले सुद्धा दावेदार झालेत. . .

प्रशासनात काम करून निवृत्ती नंतर पक्षात प्रवेश केलेले पक्षासाठी पाहिजे तेवढे योगदान नसलेले आदरणीय देशमुख साहेब गावोगावी फिरून वातावरण तापवून उमेदवारी मागु लागले आहेत. . उमेदवारी तुम्ही मागा पण त्यासाठी पक्ष आहे गावोगावी कशासाठी पत्रकार परिषदा घेताय ?

आदरणीय साहेबांबरोबर गेली चार ते पाच दशके काम केलेल्या आदरणीय विजयदादांच्या मनाचा जर पक्षाकडून कानोसा घेतला नाही तर पक्षाचे किती नुकसान होईल हा तरी पक्षाने विचार करायला हवा !

लोकशाहीत काम करताना लागणारी निष्ठा व निवडून यायची क्षमता हे दोन्ही गुण आदरणीय दादांसाहेबांकडे आहेत. .
आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेबांनी किमान चार पाच वर्ष पक्षासाठी काम करावे व बिनधास्त उभे रहावे किंवा पक्षानेही त्यांना विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर घ्यावे . तेही चांगलेच आहेत मात्र पक्षाकडून विजयदादांवर अन्याय करून जर अशी उमेदवारी लादली गेली तर माढा लोकसभा व सोलापूर जिल्ह्यातील बरेच विधिसभा मतदारसंघात बंडाळी होऊन पक्षाचे फार मोठे नुकसान होईल असे वाटते.

आज देशातील व महाराष्ट्रातील जनता चातकासारखी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस परत सत्तेवर येण्यासाठी वाट पाहत आहे , मात्र पक्षातील नेतेच जर गटबाजीत विखुरले गेले व एकएक सीट पाडापाडीच्या राजकारणात गेली तर पक्षासाठी चालून आलेली संधी हुकण्याची शक्यता वाटते. राष्ट्रवादीचा एक सामान्य कार्यकर्ता . . . म्हणून हा लेखन प्रपंच !

–  श्री विजय शंकरराव पिसाळ , नातेपुते

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!