मुंबई : पुणे एक्स्प्रेस महामार्गावर ट्रॅफिक जॅम झाल्याने रुग्णवाहिका अडकली होती. त्यामार्गे जाणारे खासदार इम्तियाज जलील या वेळी रस्त्यावर रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी उतरले. गेल्या ४५ मिनिटांपासून ही रुग्णवाहिका रहदारीमध्ये अडकली होती. त्यात असणाऱ्या रुग्णाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण, असा सवाल करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इम्तियाज जलील यांनी सोशल मिडियावर पोस्ट केला आहे.
वक्फ बोर्डाच्या बैठकीसाठी खासदार इम्तियाज जलील मुंबईला गेले होते. वक्फ बोर्डात चाललेल्या भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांवर काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजण्यात आली होती, तसेच यातील आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी बैठकी दरम्यान केली. इम्तियाज जलील गेल्या काही दिवसांपासून विरोधकांविरोधात चांगलेच आक्रमक भूमिकेत दिसत आहेत. वक्फ बोर्डाच्या प्रकरणावरून त्यांनी काही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
बैठकीनंतर मुंबई वरून परत येत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर ट्रॅफिक जॅम झाली होती. वाहनांची मोठी रांग लागली होती. त्यातच एक रुग्णवाहिका अडकली होती. मोठी रांग असल्याने रुग्णवाहिकेला पुढे जायला जागा मिळत नव्हती. त्या गर्दीत इम्तियाज जलील यांची सुद्धा गाडी अडकली होती, तिथे अडकलेली रुग्णवाहिका बघून इम्तियाज जलील गाडीतून खाली उतरून रुग्णवाहिकेला रस्ता करून देण्यासाठी पुढे आले. बराच वेळा पासून अडकलेली रुग्णवाहिका इम्तियाज जलील यांच्या प्रयत्नांमुळे कशी-बशी निघाली.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे. रुग्णाचा त्या गर्दीतच मृत्यू झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच रुग्नावाहीकांसाठी काहीतरी उपाययोजना करणे आता गरजेचे आहे, त्यामुळे आपण अनेक लोकांचे जीव वाचवू शकू, असा विचार त्यांनी सोशल मिडियावर व्यक्त केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

