मालेगाव : जगाच्या इतिहासातील सर्वात मोठ सामाजिक संकट ‘कोरोना’ विषाणूमुळे आपल्या सगळ्यांवर आलेल आहे. यामुळे राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली असून, राष्ट्रीय आपत्ती हाताळतांना अतिसंवेदनशील राहून प्रत्येकाने चोखपणे जबाबदारी पार पाडावी. त्याच बरोबर सर्व विभाग प्रमुखांनी आपसात समन्वय राखून एकत्रितपणे कोरोनाशी लढा देत आपल्या लोकसेवेला न्याय द्यावा. अशा सुचना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज दिल्या.
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात सर्व विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, प्राताधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले, कोरोना विषाणूने आपल्यासमोर फार मोठे संकट उभे केले आहे. आणि या संकटाचा मुकाबला करण्याचे आव्हान स्विकारून यावर आपण नक्कीच मात करू असे सांगत उपस्थित सर्व विभाग प्रमुखांचे समुपदेशनच मांढरे यांनी यावेळी केले. महानगरपालिका, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना मोबाईल शौचालय, बॅरिकेट्स व आरोग्य प्रशासनासाठी आवश्यक साधन सामुग्री, धान्य, इंधन आदि अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी कमतरता भासू देणार नाही. मात्र सुयोग्य नियोजन अपेक्षीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
सुरक्षा पासेस करिता धोरणात्मक निर्णय
संचारबंदीच्या कालावधीत आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षा पासेस देण्याबाबत आज धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. याकरिता दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त व अपर पोलिस अधिक्षक यांनी समन्वय साधून सुरक्षा पासेसचे वितरण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले.
शहरातील पेट्रोलपंप सर्वसामान्य नागरिकांसाठी जरी बंद केले असले तरी, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील पेट्रोल, डिझेल देतांना त्याच्या नोंदी ठेवाव्यात. महानगरपालिकेने नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवाव्यात, अत्यावश्यक सेवा सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. सिंहस्थाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात नाशिक शहरामध्ये बॅरिकेट्स उपलब्ध आहेत, ते ताब्यात घेऊन पोलिस प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्रात त्याचा सुयोग्य वापर करावा. त्याच बरोबर बॅरेकेटींग झाल्यानंतर सामाजिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने रोड मॅप तयार करावा. व तो सर्वसामान्य नागरिकांना माहिती होईल अशी व्यवस्था करावी. कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू’ व ‘महाकवच’ या ॲप्स बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून त्याचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

