टीम महाराष्ट्र देशा : सोमवारी (27 जानेवारी) करोना व्हायरस आजाराच्या अनुषंगाने राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. निरीक्षणाखाली रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले. चीन आणि विशेषकरून वुआन प्रांतातून आलेल्या राज्यातील रहिवाशी प्रवाशांना संपर्क करुन त्यांच्या प्रकृतीची विचारणा करणे, आदीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
मुंबई येथील जी.टी. रुग्णालयातील सभागृहात सकाळी बैठक झाली. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी यावेळी उपस्थित होते.
रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असलेल्या ज्या तीन रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांचे पुन्हा चार दिवसांनी नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवावे, दुसरा नमुनाही ‘निगेटिव्ह’ आला तर त्या रुग्णाला डिस्चार्ज द्यावा. त्याने घरी राहून किमान आठवडाभराची विश्रांती घ्यायचा सल्ला देण्यात यावा. समजा एखाद्या रुग्णाचा पहिला नमुना ‘पॉझिटिव्ह’ आला आणि दुसरा ‘निगेटिव्ह’ आला तर अशा रुग्णांवर रुग्णालयातच उपचार करावे, असे करोनासाठी तपासणी केलेल्या रुग्णांच्या बाबतीत डिस्चार्ज धोरण यावेळी ठरविण्यात आले.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 जानेवारीपासून थर्मल स्कॅनर यंत्रणा कार्यरत आहे. 27 जानेवारीपर्यंत सुमारे 2600 प्रवाशांची तपासणी त्याद्वारे करण्यात आली. मात्र चीन आणि विशेष करुन वुआन प्रांतातून जर कोणी प्रवासी 18 जानेवारीपूर्वी मुंबईत दाखल झाला असेल अशा 1 जानेवारी पासूनच्या प्रवाशांची यादी विमानतळ प्राधिकरणाकडून घेण्यात येईल. त्यातील महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात येऊन त्यांना सर्दी, ताप वा तत्सम लक्षणे आढळली आहेत का ? किंवा कुटुंबातील सदस्यांना जाणवत आहे का याबाबत विचारणा करावी. असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
बैठकीस आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. साधना तायडे, डॉ. प्रदीप आवटे, एनआयव्हीचे तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
