मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात मराठा समाजाने आक्रमक भुमिका घेतल्याचे पाहायला मिळत असतानाच पुण्यासह नाशिक आणि मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून आवाज दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यात कार्यकर्ते एकत्र येऊन १७ सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करणार असल्याचे सांगण्यात येत होते. ५ पेक्षा अधिक कार्यकर्ते जमल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील या नोटिशीतुन सांगण्यात आले होते.
यानंतर आता राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यांनी, लोकशाहीतील अधिकारांची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी या पत्रातून केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रात काय म्हटले आहे?
“मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावणे सुरु केले आहे. नाशिक, पुणे आणि मराठवाड्यातील आंदोलकांना पोलीस प्रशासनाने वैयक्तिक फोन करुन आणि नोटीसी बजावून आंदोलकांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार सुरु केला आहे.”
“मराठा समाज हा आक्रमक म्हणून ओळखला जातो. जिथे अन्याय झाला तिथे न्यायाची बाजू घेऊन लढणारा हा समाज आहे. मग तेव्हा त्याने कधीच जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली. आज हा लढा स्वतःसाठीच उभारण्याची वेळ आली आहे. देशरक्षणार्थ नेहमीच सज्ज असणारा हा समाज कायद्याचे पालन करणारा आहे. मूक मोर्चा वेळी सर्व जगाने ते पाहिले आहे.” असा दाखलाही संभाजीराजेंनी दिला.
“न्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारणे हा प्रत्येक व्यक्ती आणि समाजाचा अधिकार आहे. त्या अधिकाराची गळचेपी न करता, मराठा समाजाला आपली नाराजी व्यक्त करण्याची मुभा देण्यात यावी. त्या उपरही जर प्रशासनाने सहकार्य न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तर ते चिघळण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपणास आमची मागणी हीच राहील की, आंदोलकांना पोलीस आणि प्रशासनाने सन्मानाची वागणूक द्यावी” अशी मागणी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- कोरोनावर मात करत खासदार नवनीत राणा पोहचल्या संसदेत
- उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर अमरावतीत वादंग, एबीव्हीपीने केला दडपशाहीचा आरोप
- कांदा निर्यात बंदी त्वरित मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे पियुष गोयलांना पत्र
- वाशीम जिल्ह्याला हवे आहे अत्याधुनिक कोविड उपचार केंद्र, माजी आमदारांच्या मागणीला मिळेल का न्याय?
- वर्ध्यात आरोग्य अधिकारी कोरोनाबाधित, जिल्हाधिकारी गृहविलगिकरणात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

