नवी दिल्ली : देशभरात काल आणखी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 390 झाली आहे. दरम्यान नागरिक अजूनही लॉक डाऊनला गांभीर्यानं घेत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंत व्यक्त केली आहे. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सूचनांचं पालन करा असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका असं आवाहन जनतेला केलं आहे.
खाजगी रुग्णालयांनी आपल्या अत्यावश्यक नसलेल्या सेवा तूर्तास स्थगित कराव्यात आणि कोरोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार करावेत अशा सूचना राज्य सरकारनं जारी केल्या आहेत. खाजगी रुग्णालयांनी कोरोना संसर्गावरील उपचारांसाठी सज्ज रहावं. कोणताही गंभीर आजार नसलेल्या रुग्णांना रुग्णालयात ठेवून घेऊ नये तसंच रुग्णासोबत केवळ एकाच नातेवाईकाला रुग्णालयात राहण्याची परवानगी द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

