मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रेड झोनमध्ये असणाऱ्या भागांमध्ये लॉकडाऊन कायम असणार आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगर, ठाणे , कल्याण डोंबिवली, पुणे शहर आणि आजूबाजूचा भाग, नागपूर या प्रमुख ठिकाणी लॉकडाऊन कायम असणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ३ मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचं ? किती वेळ घरी बसायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे.
रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्लालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी करोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. रेड झोनमध्ये मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे. कल्याण आणि पनवेलपर्यंत जो काही परिसर येतो तो आहे. पुणे आणि आजुबाजूचा परिसर तसंच नागपूरमधील काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी आकडे वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे पण अजूनही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. ग्रीन झोनमध्ये आपण आधीच शिथिलता आणत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

