🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : तासगाव-कवठेमंहकाळ मतदारसंघाच्या आमदार सुमन पाटील यांनी विधानसभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. तसेच तासगावमध्ये तात्काळ चारा छावणी सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारला केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यातही शेतकऱ्यांबद्दलची तीच तळमळ या अधिवेशनात दिसून आली.
राज्यात फडणवीस सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांनी दुष्काळाचा मुद्दा चांगलाचं उचलून धरला आहे. तसेच यंदा राज्याला दुष्काळाचा भीषण सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यात जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर अनेक ठिकाणी शेतकरी चारा पाण्याची कमतरता असल्याने जनावर विकत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुमन पाटील यांनी विधानसभेत भाष्य केले.
त्या म्हणाल्या की, शेतकऱ्यांना आपली जनावरे कवडीमोल भावाने विकावी लागतील, त्यामुळे तासगाव तालुक्यात तात्काळ चारा छावणी सुरु करावी. तसेच सरकारने अद्यापही कुठिलीही योजना सुरू केली नाही. त्यामुळे हजारो शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तालुक्यातील अनेक गावांचे मिळून 22 हजार हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू असून 1500 हेक्टर द्राक्षबागेला चक्क टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. याबाबत जलसंपदा मंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन टेंभू योजनेद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सुमन पाटील यांनी केली.
दरम्यान दिवंगत नेते आर.आर.पाटील हे देखील त्यांच्या कारकिर्दीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसर असत. तसेच सातत्याने गोरगरीब जनतेचा व गावकडच्या माणसांचा विचार करणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या प्रमाणे सुमनताई देखील विधानसभेमध्ये प्रकर्षाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळावा यासाठी झगडत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
