धुळे : गेल्या पाच महिन्यात कोरोना महामारीने घातलेला कहर व त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेली संभ्रमता यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील परीक्षांचा गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या नुकसानीची जबाबदारी घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, मागणी अभाविपने केली आहे.
याच, पार्श्वभूमीवर काल धुळ्यामध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा अभाविप आंदोलकांनी अडवला होता. यानंतर, पोलिसांना बळाचा वापर करत या आंदोलकांना हटवावे लागले होते. यानंतर, पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर अभाविपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे निवदेन द्यायचे होते, मात्र त्यांनी वेळ नाकारल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांचा ताफा जाताना हे आंदोलन करावे लागल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरून या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचे आरोप देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी लावले. तर, भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी देखील ट्विट केले असून, मारहाण करणाऱ्या धुळे पोलिसांवर कारवाईची मागणी देखील त्यांनी केली होती. यानंतर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी ट्विटरद्वारे या हल्ल्याचा निषेध केला.
दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर, कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाच्या सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आले असल्याने, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत द्यावे, चालू वर्षाच्या शैक्षणिक शुल्कात ३० % कपात करण्यात यावी तसेच, विद्यापीठांनी लावलेल्या चुकीच्या निकलांचे पुनर्मूल्यांकन करावे, अशा मागण्या अभाविपतर्फे करण्यात येत असून त्या मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

