नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांना खुर्ची संकटात येताच प्रभू रामावरुन राजकारण करण्याची बुद्धी झाल्याचे दिसत आहे. खरी अयोध्यानगरी भारतात नसून नेपाळमध्ये आहे, तर प्रभू रामचंद्रही नेपाळी होते, असा जावईशोध ओली यांनी लावला.
भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असं वक्तव्य ओली यांनी केलं आहे. तसंच आपल्याला पंतप्रधान पदावरुन दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत असंही ओली यांनी म्हटलं आहे.
नेपाळी कवी भानुभक्त आचार्य यांच्या 206 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान ब्ल्यू वॉटर येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की “नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार होत आहेत. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केली जात आहे. आमचा अजूनही विश्वास आहे की आम्ही भारतीय राजपुत्र रामाला सीता दिली”
भगवान राम यांच्या जन्मस्थळाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ओली यांना स्वतःच्या देशातही टीकेला सामोरे जावे लागत आहे. अनेक नेपाळी नेत्यांनी ओली यांच्या वक्तव्याचा उघडपणे विरोध केला आहे. भारत आणि नेपाळमध्ये तणावाची परिस्थिती असताना ओली यांनी वादग्रस्त दावे टाळावेत, असा सल्ला त्यांना दिला जात आहे.
“राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतात असलेली अयोध्या खरीखुरी नाही”, असाही दावा ओली यांनी केला. “भारतातली अयोध्या खरी असेल तर तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो ?” असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचाही दावा ओली यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट वक्तव्यांमुळे केपी ओली शर्मा हे चर्चेत आहेत. तसेच नेपाळमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे.
पत्रास करण की… फडणवीसांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

