किरण काळे (पैठण ) – घडलेल्या गोळीबाराचा पुनः एकदा निषेध करतो या घटनेची चौकशी सूरु असून जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करू. भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन आंदोलनात शेतकऱ्यावर गोळीबार करणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन तेलवाडी (ता.पैठण) येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
पैठण व शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या ऊसदर आंदोलनात झालेल्या गोळीबारात पैठण तालुक्यातील तेलवाडी येथील शेतकरी उद्धव मापारी व नारायण डुकळे यांना पोलिसांची गोळी लागून ते जखमी झालेले होते . जखमी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रु. ची मदत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कडून जाहीर केली होती. त्याचे धनादेश देण्यासाठी खा. रावसाहेब दानवे हे तेलवाडी (ता.पैठण) येथे आले होते. उपस्थित गावकऱ्यांसमोर बोलताना खा.दानवे यांनी घडलेल्या गोळीबाराचा पुनः एकदा निषेध केला. या घटनेची चौकशी सूरु असून जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्याची हमी दिली.

भाजपा सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून या सरकारने आता पर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या कर्जमाफीचा पैठण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलनात शेतकऱ्यावर गोळीबार करणे चुकीचे असून मी या घटनेचा जाहीर निषेध करून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्याबाबत मी मा. मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून शासनाला निर्णय घेण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शेतकरी, गावकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



