मुंबई : ‘उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. तो मंत्रीपुत्र आजही मोकाट आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणा आज कुणालाही अटका करीत आहेत. पण चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला आहे. त्याची झोप उडवण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केले. इंदिराजींचे अस्तित्व या निमित्ताने पुन्हा दिसले’ या शब्दांत ‘सामना’च्या आजच्या ‘रोखठोक’मधून शिवसेना संजय राऊत यांनी कौतूक केले आहे.
रोखठोक मध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्या घरात पोहोचली आहे. लोक रोज जन्माला येतात आणि किड्यामुंग्यांसारखे मरतात. त्यामुळे उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात भाजपच्या मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले याचे विरोधकांनी इतके भांडवल का करावे? असा प्रश्न जगाला पडला आहे. हे सर्व प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या अंगलट आले आहे.
‘चार शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आहेच, पण त्याच रात्री लखीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. ‘मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?’ या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते!’
‘प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला. 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा. प्रियंकांची गाडी आधी रोखली. त्यांना गाडीतून उतरवले. पुढे जाऊ नये असे बजावले. त्यांनी नकार दिला. कोणत्या कायद्याने मला अडवताय हा त्यांचा प्रश्न.
‘आपण पोलिसांच्या गाडीत बसा असे सांगताच ‘वॉरंट असेल तर दाखवा. मी अशा पद्धतीने बेकायदेशीररीत्या तुमच्यासोबत येणार नाही.’ हे त्यांनी योगींच्या पोलिसांना ठणकावले. त्या काळोखात इंदिरा नावाची वीज पुन्हा कडाडली आहे असाच भास देशाला झाला. प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियंका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियंका यांच्या एका झाडूने मात केली. नेते जेव्हा साहस दाखवतात तेव्हा कार्यकर्त्यांत विश्वासाची मशाल पेटते. सीतापूरला शेवटी तेच झाले’ असे राऊत म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
- ‘नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते’
- अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा – नवाब मलिक
- वेळ आली तर कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू; अजित पवार यांची ग्वाही
- नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, रास्ता रोको करत दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

