मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या नियुक्तीत भाजप आडकाठी करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र हा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. उलट मुख्यमंत्री ठाकरे आपल्या पदावर कायम राहिले तर आम्हाला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाचे आरोप फेटाळून लावले. फडणवीस म्हणाले की, आम्हाला मागच्या दारानं सत्ता स्थापन करण्यास रस नाही. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद नियुक्तीवरुन राज्यपाल घटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतील असा विश्वास आहे असं ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर भाजपाला आनंदच आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको असे आम्हाला पण वाटते, असे फडणवीस म्हणाले.
तसेच देवेंद्र फडणवीस राज्यात राष्ट्रपती लागू करू इच्छित आहेत, असा आरोप राज्यचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला होता. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपला वाटत असून त्यातूनच त्यांचे खटाटोप सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात महाराष्ट्रामध्ये माध्यमांची गळचेपी सुरू आहे. अघोषित आणीबाणीसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली होती. या पत्रातून राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असाच सूर निघत असल्याचं दिसत आहे.
भाजपकडून राज्यात राष्ट्रपती लगावट लागू करण्याचे प्रयत्न : जयंत पाटलांचा गंभीर आरोप
दरम्यान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचं सदस्य होणं बंधनकारक आहे. उद्धव ठाकरेंची ही मुदत २८ मे रोजी संपत आहे त्यामुळे तत्पूर्वी त्यांना आमदार व्हावं लागेल अन्यथा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहणार नाही.विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त २ रिक्त जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंचे नाव घोषित करावे यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मंत्रिमंडळाने शिफारस दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
