🕒 1 min read
मुंबई : राज्यातील होमगार्ड गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. महाराष्ट्र राज्य होमगार्डमध्ये ४५ हजार ४९३ होमगार्ड कार्यरत आहेत. त्यातील प्रत्येक जवानाला वर्षांतून किमान २०० दिवस रोजगार देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र ६ सप्टेंबरपासून होमागार्ड मानधनापासून वंचित असल्याची तक्रार राज्याचे महासमादेशक आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी केली होती.
तसेच, काही महिन्यांपूर्वी हायकोर्टाने होमगार्ड जवानांना कायमस्वरूपी बंदोबस्त देण्यात यावा, असे राज्य सरकारला खडसावले होते. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. होमगार्ड जवानांच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होमगार्ड जवानांनी केला होता.
त्यानंतर आज राज्यातील गृहरक्षक दलात काम करणारे कर्मचारी म्हणजे होमगार्ड यांचा कर्तव्यभत्ता ३०० वरून आता ५७० रुपये प्रतिदिन करण्यात आला आहे. तसेच होमगार्ड या पदासाठी वर्षातून किमान ५० टक्के रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आहे, असे उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिले.
शिवाय होमगार्डची वयोमर्यादा ५५ वरून ५८ वर्षे करण्यात आली आहे. सोबत कामावरून कमी केलेल्या होमगार्डना माफीनामा घेऊन संघटनेत पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे. होमगार्डला गणवेश किट भत्त्यासाठी रकमेत २५०० रुपये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी सभागृहाला दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

