मुंबई: चारच दिवसांपूर्वी कश्मिरी पंडित असलेल्या शिक्षकाची आणि शीख धर्मीय महिला प्राचार्याची हत्या केल्यानंतर बेभान झालेल्या अतिरेक्यांनी आता लष्कराच्या पाच जवानांचा बळी घेण्याचे धाडस केले आहे. या घटनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून या घटनेचा निषेध केला आहे.
जम्मू – कश्मीरचे तमाम विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर कश्मीरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत . इतर धर्मीयांनी कश्मीरात पाऊलच ठेवू नये या विकृत मानसिकतेतून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अतिरेक्यांनी कश्मीरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे . सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा ‘ पाँच के पच्चीस ‘ असा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे. असा संताप त्यांनी सामनातून व्यक्त केला आहे.
जम्मू -कश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना सोमवारी आपले पाच जवान शहीद झाले. ही बातमी अस्वस्थ करणारी आहे. कधी सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबारात, तर कधी पाकिस्तानने पोसलेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात किंवा चकमकीत हिंदुस्थानी जवान धारातीर्थी पडल्याच्या घटना जेव्हा समोर येतात, तेव्हा कुठल्याही राष्ट्रभक्त नागरिकाचे रक्त उसळल्याशिवाय राहत नाही. पुन्हा थेट युद्धाला तोंड फुटलेले नसताना लपून-छपून केलेल्या भ्याड हल्ल्यांत आपल्या जवानांना जीव गमवावा लागतो हे अधिक संतापजनक आहे.
सुरक्षा दलाच्या जवानांनीही ‘मूँहतोड जवाब’ देण्याचा प्रयत्न केला खरा, पण या चकमकीत दुर्दैवाने लपून वार करणारे अतिरेकी वरचढ ठरले. झाडांमागून अचानक झालेल्या गोळीबाराने जवानांच्या शरीराची चाळण झाली. लष्करातील जेसीओ दर्जाच्या अधिकाऱ्यासह अन्य चार जवान गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जवानांना तातडीने नजीकच्या लष्करी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, पाचही जवान शहीद झाले. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी अतिरिक्त कुमक पाठवून या जंगलातील संपूर्ण भागाची नाकाबंदी केली आहे. पाच जवानांचे हत्याकांड घडविणाऱ्या अतिरेक्यांना शोधून त्यांच्या चिंधडय़ा उडविल्याशिवाय हिंदुस्थानी मन शांत होणार नाही. सुरक्षा दलाचे जवानही आपल्या सहकाऱ्यांच्या बलिदानाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र, जम्मू-कश्मीरात पुनःपुन्हा जाणारे जवानांचे हे बळी आणखी किती वर्षे आपल्याला सहन करावे लागणार आहेत? असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारचा या बंदशी सूतराम संबंध नाही, भाजपच्या कृत्याचा निषेध म्हणून जनताच उत्स्फूर्तपणे सहभागी झाली’
- उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु आहे – पटोले
- ‘अतिवृष्टीने शेतकरी बेजार झालाय, महाराष्ट्र सरकार मात्र हफ्तावसुली करण्यात मग्न…कुछ तो शर्म करो’
- ‘अतिवृष्टीमुळे शेतकरी डबघाईला आलेला आहे, मात्र राज्य सरकारने अद्यापही मदत जाहीर केली नाही’
- राज्याचा विकास बंद करून ठाकरे, पवार व गांधी परिवाराचा विकास चालू आहे; गावडेंची घणाघाती टीका


