टीम महाराष्ट्र देशा : आपल्या शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीची सवय झाली आहे, ती बंद झाली पाहीजे, त्यासाठी त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळायला पाहीजे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथील शासकीय विश्राम गृह येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
मुश्रीफ पुढे म्हणाले की , अहमदनगर जिल्ह्यात एका मुलाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना या मार्गाला जाऊ नका म्हणून आवाहन करणारी कविता लिहली, मात्र त्या मुलाच्या वडीलांनीच त्यानंतर तीन तासांत आत्महत्या करण्याचा प्रकार ह्रदयदावक आणि दुर्दैवी आहे.अगदी हृदय पिळवटून टाकणारी ही बातमी आहे.
राज्य शासनाने गेल्याच आठवड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या नावावर वर्ग केली. शेतकऱ्यांना दोन प्रकारे दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. एकट्या नगर जिल्ह्यात २५०० कोटीची कर्जमाफी दिली आहे. पूरग्रस्तांचे ७० टक्के पैसे जमा केले आहेत. तूर, कापूस यासारखी पिके हमीभावाने स्वतः शासनाने खरेदी करण्यास सुरूवात केली आहे.असेही त्यांनी सांगितले.
मुश्रीफ म्हणाले,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी चिंतामुक्त कसा होईल यासाठई प्रयत्न सुरू आहेत. नगरचा पालकमंत्री म्हणून त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहू, विशेषतः त्याच्या मुलावर काय परिणाम झाला असेल. या कुटुंबाला जास्तीत जास्त अर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुस्लिमांना नोकऱ्यांत आरक्षणचा निर्णय नाही, फक्त शिक्षणात आरक्षण देण्यात येणार आहे. शेतकरी आत्महत्येची कारणे शोधली पाहिजेत. पाऊस चांगला झाला, कर्जमाफी झाली तरीही असे प्रकार का होतात का ते तपासावे लागेल. नियमित कर्ज परतफेड करणारे आणि दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल,असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.


