पुणे : चीन देशासह अनेक देशात करोनाचा प्रसार वाढला आहे. त्याचे परिणाम आता भारतीय बाजारपेठांत दिसू लागले आहेत. गेल्या एक महिन्यापासून चीन, इराणसह अन्य काही देशातून मसाले आणि ड्राय फ्रूटसची आयात आणि निर्यात पूर्णपणे ठप्प झालेली आहे. यामुळे बदाम, काजू आणि बेदणाचे दर स्वस्त झाले आहेत. तर आक्रोड आणि खजूरच्या दरात वाढ झाली आहे. बाजारात या काळात मागणी मोठी असते परंतु तुलनेने ड्राय फ्रूटसची मागणी स्थिर आहे.
तसेच यंदा पाऊस जास्त झाला असल्याने उत्पन्न वाढले आणि आयात, निर्यात बंद झाल्याने इतर खाद्य पदार्थाचे भाव १० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. भारतातून चारोळी, अक्रोड, बेदाणा, काजू मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाते. दर वर्षी या काळात ड्राय फ्रूटसला मोठी मागणी असते. त्यामुळे ड्राय फ्रूटस आणि मसाल्याच्या पदार्थ तेजीत असतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे भाव कमी असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी नवीन गोयल यांनी सांगितले.
इराणवरून येणारी खजूर उत्पादनाची आयात थांबली आहे. त्यामुळे खजुराचे दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. तसेच भारतात यंदा अक्रोडचे उत्पन्न कमी झाले असून चिली आणि कॅलिफोर्निया या देशातून देखील अक्रोड आयात होते, ती आयातही सध्या बंद आहे. तसेच सदर ठिकाणी देखील यंदा उत्पन्न कमी आहे. यामुळे अक्रोडच्या भावात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे गोयल यांनी सांगितले.
तर बदाम हा इराण आणि कॅलिफोर्निया येथून आयात केला जातो. बदामला चीनमधून मोठी मागणी असते. सध्या दोन्ही देशातून चीनला निर्यात बंद आहे. तसेच भारतात निर्यात वाढली आहे. त्यामुळे बदाम च्या भावातही २० ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. बदामाचा हंगाम हा जानेवारी ते मे महिन्यापर्यंत असतो. तसेच ऑस्ट्रेलियाचा बदामाचा हंगाम हा नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात असतो. त्यामुळे आयात निर्यातीची बदलती समीकरणे महागाईत भर घालणारी ठरत आहे.
पुणे मार्केट यार्डातून ड्राय फ्रूटस आणि मासाल्यांना पुणे शहर, उपनगरे, सातारा, कोल्हापूर, नगर, सोलापूरसह महाराष्ट्रातील विविध भागातून मोठी मागणी असते. सध्या कोरोनामुळे मागणीत मोठी घट झाली आहे.
जर पाहायला गेले तर मागच्या काही दिवसांपासून ड्राय फ्रूटसच्या भावामध्ये कमालीची बदल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बदामाचे भाव ६८०-७३० रुपये प्रती किलो होते आणि आता सध्याचे भाव ५८०-६५० रुपये इतके झाले आहेत,अक्रोडचे दर ४५०-९५० रुपये किलो वरून ८५०-१४०० पर्यंत पोहचले आहेत, खजूरचे भाव ५५ रुपये किलोवरून ११० रुपये किलो अशी दुप्पट वाढ झाली आहे ,बेदाणा २८०-३५० रुपये किलोपासून सध्या १४०-२२० रुपये प्रतिकिलो पर्यंत कोसळला आहे तर काजूचे भाव ८५०-१२००रुपयांवरून ६००-८५० रुपये प्रतिकिलो पर्यंत आले आहेत.


