पुणे : ‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच नागरिकांनी बाहेर पडू नका, गर्दी करू नका असं आवाहन सतत प्रशासनाकडून केलं जात आहे. तर दुसरीकडे आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर ‘कोरोना’ रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे.
याच पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपूर्वी आपण डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या, थाळ्या, शंखनाद केला. मात्र आठ दिवसांनी या डॉक्टरांवर हल्ला होतोय. आठ दिवसात हल्ला होण्याइतकं असं काय घडलं? त्यामुळे आपण जबाबदार नागरिक आहात का? असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
ते एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘भारत पाकिस्तानची मॅच असेल किंवा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी आपलं देशप्रेम उफाळून येतं. मात्र आताच्या परिस्थितीत ‘कोरोना’ विरुद्ध लढाई ही देशसेवा आहे, असंही कोल्हे म्हणाले.
दरम्यान, या कठीण काळात सर्व डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आणि प्रशासन जीवाची बाजी लावत आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून ते रुग्णसेवा करत आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.


