🕒 1 min read
औरंगाबाद : काँग्रेस पक्षाच्या जवळ सर्व प्रकारची माणसे आहेत. मात्र युवकांची कमतरता असल्यामुळे या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केले आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीने औरंगाबादचे संपर्कमंत्री, व राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीसाठी गांधी भवन येथे औरंगाबादच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला आमदार धीरज देशमुख हे देखील उपस्थित होते. त्यावेळेस देशमुख बोलत होते.
दरम्यान, देशात व राज्यात काँग्रेसने अनेकवेळा चढ-उतार बघितले आहेत. राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस मजबूत होत आहे. गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंत मनामध्ये असलेल्या मतभेदांना संपवून टाका आणि एकजुटीने आगामी काळात होणाऱ्या औरंगाबादसह सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
औरंगाबाद महापालिकेसाठी ११५ जागा आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षणाचे वार्ड आरक्षित आहेत. देशमुख यांनी या वार्डातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. काँग्रेस पक्षात काम करत असलेल्या युवक काँग्रेस, सेवादल, अल्पसंख्यांक आघाडी, मागासवर्गीय विभाग , एनएसयुआय , इंटक , असंघटित कामगार आघाडी, महिला आघाडी, किसान आघाडी या सर्व पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना आमदार अमित देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष हे मोठे घर आहे,या घरात भांड्याला भांडे लागते त्यामुळे मतभेद आपल्याला दिसतात परंतु ते जिवंतपणाचे लक्षण आहे. आमच्यामध्ये वैचारिक मतभेद नाहीत तसे मनभेद नसले पाहिजेत तरच राज्यात पुन्हा काँग्रेस उभी करता येईल. त्यामुळे आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे रणनीती ठरवण्याची गरज आहे. मनपाच्या निवडणुकीत जातीने लक्ष घालत निवडणूक कशी जिंकता येईल याबाबत नियोजन केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या वार्डात, आपल्या भागात कोणत्या प्रकारचे काम केल्यास आपल्याला यश येऊ शकते यादृष्टीने प्रयत्न करावेत. मनपाची निवडणूक ही आगामी सर्व मोठ्या निवडणुकीची पूर्वतयारी समजावी. प्रत्येक कार्यकर्त्याने ही निवडणूक गंभीरपणे घेऊन औरंगाबाद महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा कसा फडकेल यादृष्टीने विचार केला पाहिजे.
तर , प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मनपाची निवडणूक गंभीरपणे घेतल्यामुळे त्यांनी कोरोना येण्यापूर्वी मुजफ्फर हुसेन, किशोर गजभिये व दादासाहेब मुंडे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांनी वेगळ्या बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीबाबत काय केले पाहिजे याबाबत माहिती दिलेली आहे. आगामी काळात अधिक गतिशील काम करून औरंगाबदची निवडणूक सोपी करू, त्यासाठी स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीचे नियोजन करणे आवश्यक आहे, असेही देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात सुधारित कायद्यांची आवश्यकता, अशोक चव्हाण यांची मागणी
- …तर पत्र लिहायची वेळच आली नसती, भाजपची अशोक चव्हानांवर सडकून टीका
- अभेद्य काँग्रेससाठी मन व मतभेद संपवून एकजुटीने कामाला लागा – अमित देशमुख
- नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात नगण्य तरतूद, प्रितम मुंडेंचा घणाघात
- ऊर्जा विभागाच्या वीज कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना त्वरित सामावून घेण्याच्या प्रक्रियेस गती द्या – नितीन राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

