मुंबई : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण सर्वजण मिळून करोनावर मात करूयात. संकट गंभीर आहे. पण हे सरकारही खंबीर आहे. असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासाठी त्यांनी बुधवारी व्हिडिओद्वारे संवाद साधला. ‘ या परिस्थितीत फेरफटका मारायला घराबाहेर पडू नका, कृपया घरातच सुरक्षित राहा, असं आवाहनही यावेळी त्यांनी यावेळी केलं.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मास्कची साठेबाजी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी कौतुकास्पद काम केलं आहे. यापुढेही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची आपेक्षा आहे. तर लालबागच्या राजा मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी असे उपक्रम होणं महत्त्वाचे आहे. असं म्हणत त्यांनी लालबागच्या राजा मित्रमंडळाचं कौतुक केलं.
ते पुढे म्हणाले, ‘राज्यावर आलेलं हे संकट मोठं आहे. कोरोनाचा विषाणू जिथे अद्याप पोहोचलेला नाही तिथे आपल्याला तो पोहोचू द्यायचा नाही. त्यासाठीच सर्व उपाययोजना सुरू असून लोकांचे सहकार्य महत्त्वाच आहे. मात्र, यातून शेतकऱ्यांना शेतावर येणं-जाणं आपण बंद केलेलं नाही. शेतमालाची वाहतूक थांबवण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवांसाठीच्या कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवर कंपनीचं नाव, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहेत ते ठिकाण, तसेच त्यांच ओळखपत्र सोबत ठेवाव. त्यामुळे पोलीसांचा तुम्हाला त्रास होणार नाही, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

