🕒 1 min read
मुंबई : देशात आणि राज्यात आजपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. मात्र नागरिक मिळालेल्या शिथिलतेचा गैरफायदा घेत असून सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणत गर्दी करताना दिसत आहेत. यावर राज्याचे मात्री हसन मुश्रीफ यांनी जनतेला इशारा दिली आहे. नियमांचे पालन करा अन्यथा अजून कडक नियम करण्यात येतील असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, सव्वा महिना लॉकडाऊनमुळे शुकशुकाट होता, आज ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये थोडी शिथिलता मिळाल्यानंतर जणू काही कोरोना संपलेला आहे, हद्दपार झालेला आहे आणि त्याच्यावर आपण विजय मिळवला आहे अशा थाटात आज कोल्हापूर आणि कागलमध्ये गर्दी दिसली.
चार-पाच दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले तर सरकार दुसरं काय करु शकतं? अमेरिका, फ्रान्स, इटली यांच्यासारखे देश जे आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत, आरोग्य सेवेने परिपूर्ण आहे, त्यांनी कोरोनापुढे हात टेकले आहेत. रुग्ण वाढले तर आपल्यापुढे एकच मार्ग आहे पुन्हा लॉकडाऊन. लोकांनी स्वयंशिस्त पाळणं आवश्यक आहे. घरात सुरक्षित राहण्याची आवश्यकता आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
दरम्यान आजपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. बरीच दुकानं खुली झाली आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असूनही खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. लॉकडाऊन संपल्यासारखं लोक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा कठोर नियम लागू करण्याचा इशारा दिला.


