मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड करुन काँग्रेस पक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं चित्र आहे. महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी असली तरी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. काँग्रेसकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पदयात्रा आणि चौकसभा घेण्याचा प्लॅन आहे.
मुंबई काँग्रेस महापालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरु आहे. प्रत्येक लोकसभा मतदार संघात मुंबई काँग्रेस करणार पदयात्रा आणि एक चौकसभा होईल. सायन मध्ये उदया पहिली पदयात्रा आणि सभा होईल.
मुंबई महापालिकेत सध्या कॉंग्रेस विरोधी पक्षात आहेत. काँग्रेसचे रवि राजा विरोधी पक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. भाई जगताप यांनी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याचं जाहीर केल होते. त्याप्रमाणे सायनमध्ये काँग्रेसची पहिली पदयात्रा होणार असून त्यानंतर चौकसभा देखील घेण्यात येईल. पदयात्रेची सुरुवात सायनमधून होईल. तिथून पुढे कोळीवाडा-शुक्ला हॉटेल- कोकरी आगार- शेख मिस्त्री दर्गा- भरणी नाका- मार्गे दिनबंधूनगरमध्ये समारोप होईल.
मुंबई काँग्रेसकडून महापालिका क्षेत्रातील सर्व वार्डमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहे. याद्वारे मुंबईतील विविध विषय जनतेसमोर मांडले जाणार आहेत. मुंबईला २४ तास पाणी पुरवठा, ५०० फूट घर सरसकट मालमत्ता कर माफी, स्थानिक प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस यांचे सरकार आहे. त्यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक हे तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार कि स्वबळाचा नारा देणार हे पाहणे आगामी काळात उत्सुकतेचे ठरणार आहे.त्यामुळे एकंदरीतच यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक रंगतदार होईल यात शंका नाही.


