मुंबई : कोरोनाच्या संकटाशी लढणाऱ्या महाराष्ट्रातल्या डॉक्टरांना मी मानाचा मुजरा करतो, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टरांच्या कार्यासाठी हात जोडले. तसंच ज्या डॉक्टरांशी शक्य आहे त्या सगळ्यांशी मी बोलतो आहे मला अनेकांनी सांगितलं तुम्ही डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधैर्य वाढेल. त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही हे मला ठाऊक नाही मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर माझं मनोधैर्य वाढतं. असही त्यांनी यावेळी नमूद केले.
”मागील आठ दिवसांपसून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे, याकाळात राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनता या लॉकडाउनला साथ देत आहे, आपल्या या संयामासाठी मी आपले आभार मानतो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यतील जनतेचे आभार मानले. मुंबईमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यंमत्री ठाकरे म्हणाले, ‘जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरीही गर्दी केली जाते आहे, स्वयंशिस्त पाळली जात नाहीये. ते लवकर आवरा नाहीतर आम्हाला कारवाई करावी लागेल. पोलिसांशी विनाकारण हुज्जत घालू नका. त्यांना कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका, पोलीसही जिवाजी बाजी लावून कर्तव्य बजावत आहेत. त्यांना त्याचं काम करुद्या. असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांचेही आभार मानले. ‘ मी पोलिसांचेही आभार मानतो आहे. कारण पोलिसांचे काम हे देखील डॉक्टरांइतकेच महत्त्वाचे आहे. आपण सक्तीने घरी बसावं यासाठी ते बाहेर काम करत आहेत. त्यांचेही मी धन्यवाद देतो. घराबाहेरची लढाई तुमचंच सरकार लढतं आहे. तुम्ही फक्त घरात राहून आम्हाला साथ द्या असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या पायरीवरच करोना थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर आपण हे युद्ध जिंकल्याशिवाय राहणार नाही, असाही आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
