मुंबई : पालघर प्रमाणे उत्तरप्रदेशातील बुलंदशहरातही साधूंच्या हत्याकांडाचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर देशात चांगलीच खळबळ माजली आहे.या घडलेल्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, “योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत”.
ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेमध्ये कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्ही सुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. परंतु कोणीही या घटनांना धार्मिक रंग देऊ नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
यावर शिवसेना खा. संजय राऊत यांनीही ट्विट केले आहे. भयानक ! उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये मंदिरात दोन साधूंची हत्या. मी सर्वांना आवाहन करतो की याला धार्मिक रंग देऊ नये. ज्याप्रकारे काही लोकांनी पालघर प्रकरणात प्रयत्न केला होता.
काय आहे बुलंदशहरातील प्रकरण ?
बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना गावातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास आहे. दोन्ही साधू मंदिरातील धार्मिक विधी करतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री मंदिर परिसरात दोघांची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावातील लोक मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणात राजू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी गावापासून दोन किमी अंतरावरून अटक केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
