मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बोलावलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या शिष्टमंडळासह राज्य सरकार कोरोना संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाही.
मात्र या बैठकीला मुख्य सचिव अजोय महेता ,पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल ,संजय कुमार ,नितीन करीर ,भूषण गगरानी हे मंत्रालयातील अधिकारी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, सेनानेते मिलिंद नार्वेकर या बैठकीला हजर होते.
दरम्यान, राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री विनोद तावडे, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर यांचा समावेश होता. ‘राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात दिसून येतात. ही संख्या दररोज वाढतच आहे. अनेक लोकांना उपचार मिळत नाहीत. कोणत्या रूग्णालयात किती खाटा शिल्लक आहेत, याची कुठलीही माहिती दिली जात नाही,’ असे फडणवीस यांनी म्हटले होते.
तसेच कोरोनाचे संकट हाताळणीत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. राज्य सरकारचा प्रत्येक बाबतीतला नाकर्तेपणा समोर येत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मंगळवारी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
