नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेमुळे सध्या भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंदेखील चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर देशभरातून चीनचा मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. याच पार्श्वभूमीवर अनेक भारतीय कंपन्यांनी चीनसोबत व्यवहार करण्याचं टाळण्याचा निर्णय घेतला होता.
आता भारतीय रेल्वेनं देखील चीनला झटका देत चिनी कंपनीला कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. सिग्नल आणि दूरसंचार कामासाठी चिनी कंपनीला हे कंत्राट देण्यात आलं होतं. कानपूर आणि मुगलसराय दरम्यान इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर संबंधीत चायनीज कंपनीचा करार रद्द केला. यानंतर संबंधित चिनी कंपनीनं भारतीय रेल्वेविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’चे (डीएफसीसीआयएल) व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी हे कंत्राट रद्द करण्याचे पत्र दिल्याची माहिती दिली. त्यामध्ये असं सांगण्यात आला कि, ‘चिनी कंपनीला दिलेला कंत्राट शुक्रवारी रेल्वेने रद्द केलं. ४७१ कोटी रूपयांचं हे कंत्राट कामाचा वेग कमी असल्याचं कारण देत रद्द केलं आहे.
दरम्यान, डीएफसीसीआयएल ही या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एक संस्था आहे. चीनच्या समुहाला २०१६ मध्ये ४७१ कोटी रुपयांचे हे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार, कंपनीला २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करायचं होतं. परंतु, आत्तापर्यंत चिनी कंपनीनं केवळ २० टक्के काम पूर्ण केल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे. याच आधारावर भारतीय रेल्वेनं चिनी कंपनीचा करार रद्द केलाय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

