पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतातही या व्हायरसने शिरकाव केल्यापासून देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन, इटली, इराण, युके, अमेरिकानंतर बघता बघता कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केला आहे. देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 175 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसात 20 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण सध्या महाराष्ट्रात असून त्यांचा आकडा 47 आहे. तर, आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
ही परिस्थिती पाहता केंद्रसरकारने सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५०% वर्क फ्रॉम होम नियमावली सुरु केली आहे आणि इतर देखील निरनिराळ्या उपाय योजना आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर, अनेक खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन कामाची परवानगी दिलीय. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहे.
जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने देशात कहर माजवला आहे. चीनमधून विविध देशात पसरलेल्या या जीवघेण्या विषाणूने भारतात ही एन्ट्री केली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशवासियांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सार्क ( ८ राष्ट्रांचा समावेश असणारी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था) राष्ट्रांना कोरोना विषाणूविरोधात लढण्याचा मंत्र दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशवासियांना संबोधित करणार आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

