पुणे : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. कोरोनावर मात करता येईल पण त्यासाठी संपूर्ण देशाने एकत्र येत आलेल्या परिस्थितीचा सामना करणे महत्त्वाचे आहे, त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. सरकारच्या या देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाच्या वाढता संसर्गामुळे प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात घटली असली तरी, रविवारी आवश्यकतेनूसार एसटी सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांची गर्दी पाहून संबंधीत मार्गावर बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एसटी प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. इतर दिवशी शहरातील शिवाजीनगर आणि स्वारगेट या दोन आगारातून राज्यभरात २ हजार ६०० फेऱ्या होतात. मात्र, प्रवासी संख्या घटल्याने ही संख्या ६५० एवढी खाली आली आहे.
शुक्रवारी दोन्ही आगारातून केवळ ६५० फेऱ्या झाल्या. यातच आज (दि.२२) देशभरात जनता कफ्र्यु पाळण्यात येणार असल्याने नागरिक घराबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अनेक नागरिकांनी सध्या गावाकडे धाव घेतली आहे. ही बाब विचारात घेऊन रविवारी गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासाठी किमान १५ ते २० प्रवासी असणे आवश्यक आहे.
एसटी सेवा बंद ठेवण्यात येणार नाही. परंतु किमान प्रवासी संख्या असल्यासच बसेस सोडण्यात येणार आहेत. याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक, पुणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

