टीम महाराष्ट्र देशा- जालियनवाला बागेतील हत्याकांड ही सर्वात भयावह घटना होती असे नमूद करत या हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने भारतीयांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी लंडनचे महापौर सादिक खान यांनी केली आहे.बुधवारी सादिक खान हे अमृतसरमध्ये होते. सादिक खान यांनी जालियनवाला बागेला भेट दिली. तेथील अभ्यांगताच्या वहीमध्ये लिहिलेल्या संदेशात त्यांनी हि मागणी केली आहे.
लंडनचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून ओळखले जाणारे सादिक खान हे सहा दिवसांच्या भारत आणि पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलतानाही सादिक खान यांनी याच मागणीचा पुनरुच्चार केला. ‘जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटन सरकारने माफी मागण्याची गरज आहे. जालियनवाला बागेतील नरसंहार ही सर्वात भयावह घटना होती. या घटनेसाठी ब्रिटन सरकारने अगोदरच माफी मागायला पाहिजे होती, असे त्यांनी नमूद केले. जालियनवाला बागेत हिंदू, मुस्लीम व शीख बांधव शांततेत इंग्रजांविरोधात आंदोलन करत होते, पण डायर यांनी या निष्पापांवर गोळीबाराचे आदेश दिले, असे त्यांनी सांगितले.


