मुंबई : वाढत्या कोरोनाबाधितांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करून नवी टेस्टिंग स्ट्रॅटेजी आणली आहे. यामुळे आता कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना तत्काळ डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्यामध्ये लक्षण अगदी सौम्य आहेत, अशा रुग्णांना देखील उपचार देऊन १० दिवसांच्या आत सोडण्यात येणार आहे, त्यामुळे रुग्णांना लवकर डिस्चार्ज करण्याबरोबरच खासगी रुग्णालयांची करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठीची मानसिकता तयार करण्यात येणार आहे.
याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेने घालून दिलेल्या टेस्टिंग पॉलिसीनुसार सध्या महापालिका काम करत आहे. त्यानुसार ज्या रुग्णांमध्ये सर्दी, खोकल्याची लक्षणे असतील किंवा ज्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल असा रुग्णांची चाचणी करण्यात येते. तसेच करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना लक्षणे जाणवल्यावरच त्यांची टेस्टिंग करणं आणि सर्व गर्भवती महिलांचीही टेस्टिंग करण्याचा त्यात समावेश आहे.
तसेच करोनाबाधिताच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीची कोमॉर्बिटी अधिक आहे, अशा व्यक्तींची ५ ते १४ दिवसांत एकदाच टेस्ट केली जाऊ शकते आणि त्यांना क्वॉरंटाइन केलं जाऊ शकते. तसेच ज्यांचं होमआयसोलेशन पूर्ण झालं आहे, अशांची टेस्टिंग करण्यात येणार नाही. तसेच ज्या रुग्णांना कमी धोका संभवतो त्यांना डिस्चार्ज करताना कोणतीही टेस्ट करण्याची गरज पडणार नाही.
करोनाचे रुग्ण लवकर ट्रेस व्हावेत म्हणून पालिका डोअर टू डोअर जाऊन तपासणी करत आहे. रुग्णांचं तात्काळ विलगीकरण करण्यात यावं याासाठी पालिकेचा हा प्रयत्न आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ३० हजाराच्यावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा आकडा वाढू नये म्हणून सात आयएएस अधिकाऱ्यांवर मुंबईच्या सात झोनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान राज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५३ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात ६३ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे. राज्यात आज नवीन ६०० रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात एकूण २४ हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
