🕒 1 min read
Aaditya Thackeray | मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील आदित्य ठाकरेंनी घणाघात केला. राज्यभरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आंदोलन होऊनही त्यांना पदावरून हटवले जात नाही. भगतसिंह कोश्यारींना छुपा पाठिंबा आहे का?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. मोर्चे काढण्यात येत आहेत. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांना ह्या सर्व गोष्टींसाठी छुपा पाठींबा आहे का?. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान एकदा नाही तर अनेकदा केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबररोजी मुंबईत मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा राजकीय नाही. तर जो कोणी महाराष्ट्रप्रेमी आहे, अशा प्रत्येकाने या मोर्चात सहभागी झाले पाहीजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले राज्यपाल –
राज्यपाल गेल्या महिन्यात औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एका कार्यक्रमात बोलत होते. “जर कोणी विचारले की तुमचा आयकॉन कोण आहे, तर तुम्हाला कोणाच्या शोधात बाहेर पडण्याची गरज नाही. ते तुम्हाला इथे महाराष्ट्रात सापडतील. छत्रपती शिवाजी महाराज आता जुने झाले आहेत. तुम्ही नवीन लोकांना रोल मॉडेल म्हणून पाहू शकता. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत,” असे विधान राज्यपालांनी केले होते.


