मुंबई : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये झालेले अनेक सण सर्वांनी अत्यंत साधेपणाने साजरे केले आहे. रमजान ईदसुद्धा मुस्लिम बांधवानी साजरी केली होती. परंतु, बकरी ईदसाठी बकऱ्यांची कुर्बानी देण्यावरून सर्वांमध्ये मतमतांतर आहे. कारण, बकरी ईद साजरी करण्यासाठी त्यांना बकऱ्याची कुर्बानी देणे भाग आहे. यावर उपाय केला जाऊ शकतो का? तसेच यावर काय मार्गही काढता येईल का? यासंदर्भात राज्यात बकरी ईद साजरी होण्यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांसमवेत बैठक बोलावली होती. महत्वाचे म्हणजे बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे आपली बाजू मांडली. त्यानंतर शरद पवार यांनी बैठकीतील नेत्यांना आपली बाजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली बाजू मांडण्याची सूचना दिली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी दिली आहे.
यावर आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे. ‘आमचे प्राध्यान्य राम मंदिर नसून कोरोना आहे, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बकरी ईदच्या कुर्बानीबाबत मतभेद दूर करण्यासाठी सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांची बैठक बोलावली. प्रभू राम यांना ‘सम’बुद्धी देवो’ अस ट्विट करत भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.
आमचे प्राध्यान्य राम मंदिर नसून कोरोना आहे, असे म्हणणाऱ्या @PawarSpeaks यांनी
यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बकरी ईदच्या कुर्बानीबाबत मतभेद दूर करण्यासाठी सर्वपक्षीय मुस्लीम नेत्यांची बैठक बोलावली.
प्रभू राम यांना 'सम'बुद्धी देवो pic.twitter.com/8owL5IU711— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 27, 2020
दरम्यान, राम मंदिर भूमीपूजनावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील, असं शरद पवारांनी म्हटलंय.


