🕒 1 min read
औरंगाबाद : अतिवृष्टी आणि ओला दुष्काळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे. यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.सात) व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. डॉ. येवले म्हणाले, मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आपले विद्यापीठ कष्टकरी कुटूंबातून आलेले विद्यार्थी यांचे म्हणून ओळखले जाते. अनेक विद्यार्थी हे त्यांच्या कुटूंबातून पहिल्यांदाच पदव्यूत्तर शिक्षणापर्यंत पोहोचलेले आहेत.
त्यामुळे विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे 2019-2020 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, असा ठराव कुलगुरुंनी मांडला. सर्व सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील गावे याबद्दल शासन निर्णय असेल, त्याप्रमाणे या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात येईल, असेही येवले म्हणाले.
विद्यापीठाच्या मुख्य परिसरातील 42 विभाग आणि उस्मानाबाद उपपरिसरातील दहा विभागातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. औरंगाबाद मुख्य परिसरात विविध अभ्यासक्रमात 4 हजार 639 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर उस्मानाबाद उपपरिसरात दहा विभागात 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
