विवेक पोटफोडे।रायगड :मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमान्यांना शासनाने आपल्या गावी जाण्याची परवानगी द्यावी आणि त्यांना प्रवासासाठी एस.टी., रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणारे निवेदन महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे दिले.
या चाकरमान्यांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. दोन दोन महिने पगार नसल्याने घरमालकाने त्यांना खोल्या खाली करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत मुंबईत रहायचे कसे आणि महत्वाचे म्हणजे जगायचे कसे असा प्रश्न या चाकरमान्यांना पडला आहे. त्यातूनच अनेक चाकरमानी जीवघेणा पायी प्रवास करीत आपल्या गावाकडे निघाले आहेत, दुर्देवाने एवढी पायपीट केल्याने काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे,ही बाब देखील या निवेदनाच्या माध्यमातून जगताप यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
तसेच सध्या कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या अनुषंगाने रायगडमध्ये दोन कोरोना हॉस्पिटल सुरु करण्याची मागणी देखील जगताप यांनी केली आहे.त्यापैकी एक रुग्णालय महाड येथे तर दुसरे रुग्णालय पेण येथे सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार माणिकराव जगताप यांनी केली, त्याचप्रमाणे माणिकराव जगताप यांनी आपल्या निवेदन सोबतच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सहकार्य म्हणून जिल्हा प्रशासनाला आपले दोन महिन्यांचे निवृत्ती वेतन ( एक लाख रुपये ) जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीला दिलेआहे. माणिकराव यांच्या या सामजिक दायित्वाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

