मुंबई : राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर अनेक ठिकाणी कलम 188 लागू केले आहे. मात्र या कलम 188चे उल्लंघन अनेक ठिकाणी झाले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात आली आहे. याबबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकडेवारी जाहीर केली आहे.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, भादंवि कलम 188 अंतर्गत 96,231 गुन्हे दाखल केले असून 18,858 जणांना अटक केली आहे. तर 53,330 वाहनं जप्त करण्यात आली आहे. तर दंड म्हणून आतापर्यंत 3,56,81,994 रुपये जमा झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 189 घटना घडल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कोरानाच्या युद्धात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीला 487 कोरोनाबाधित आहेत.
487 police personnel have tested positive for COVID-19 since the lockdown.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 7, 2020
दरम्यान कोरोनाच्या काळात पोलीस यंत्रणा सक्षमपणे या संकटाचा सामना करत आहे. अनेक पोलीस आज आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. कर्तव्य बजावताना सतत अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांना देखील कोरोणाचा सर्वाधिक धिका धोका आहे. राज्यात आत्तापर्यंत 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 51 अधिकारी आणि 480 कर्मचारी आहेत. त्यापैकी 39 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
असे असतानाही पोलीस प्रशासन सक्षमपणे उभे आहे. मात्र काही ठिकाणी त्यांच्यावरच हल्ला होत असल्याचं दिसत आहे. यावर अनिल देशमुख यांनी आदेश दिले आहेत. जर असे प्रकार घडत असतील तर यावर कठोर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.


