मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र या काळात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवांची वाहतुक सुरळीतपणे सुरु राहणार आहे. या सेवा व वस्तूंच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये, म्हणून देशभरातील टोलनाक्यांवरील टोल वसुली स्थगित केली असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
याबाबत गडकरी यांनी ट्वीट केले आहे. ‘कोविड – 19 च्या दृष्टीने भारतभरातील सर्व टोल प्लाझावर टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवांच्या पुरवठ्यात येणारी गैरसोय तर कमी होईलच पण वेळेची बचत देखील होईल.’ असेही त्यांनी सांगितले आहे. ही टोल वसुली स्थगित केल्याने या वस्तू व सेवांच्या वाहतुकीत सुलभता येईल आणि वेळही वाचेल. तसेच टोल वसुलीला स्थगिती दिली असली तरीही रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व टोल नाक्यांवरील आवश्यक त्या सेवा सुरु राहतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच राज्यसरकारनेही अत्यावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्था तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर “अत्यावश्यक सेवा” असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असल्याचे संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात येईल. असे निर्देश दिले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

