टीम महाराष्ट्र देशा : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात नाटकाच्या तालमींच्या निमित्ताने झालेल्या भेटीगाठी, त्यातून जुळलेले मैत्र, ‘घाशीराम कोतवाल’चे दिवस आणि एकमेकांची मनमोकळी चेष्टामस्करी करत कित्येक दशकांच्या मैत्रीला दिलेला उजाळा.. अशा दिलखुलास वातावरणात डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे यांच्यातील जिव्हाळ्याचा अनुभव मंगळवारी रसिकांनी घेतला.
निम्मित होत, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, पुणे आणि कोथरूड शाखा तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. जब्बार पटेल यांचा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यावेळी डॉ. आगाशे म्हणाले, ‘बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर नाटक करणाऱ्या विद्यार्थ्यांना जब्बारच्या पायावर घातले जात असे, तसे मला घातले आणि मी त्याच्या गोतावळ्यात सामील झालो. त्याच्याशी भांडणाराही मी एकटाच होतो. मात्र, मैत्री तुटणार नाही याची खात्री होती. साडेतीन महिने ‘घाशीराम कोतवाल’ची तालीम केली, पण कंटाळा आला नाही. तो काळ ‘एनएसडी’तील अभ्यासाइतकाच समृद्ध होता’.
‘कलाविश्वात सत्यदेव दुबे, डॉ. जब्बार पटेल या व्यक्तींचे महत्त्व मोठे आहे. रंगभूमी आणि वास्तववादी, विचार मांडणाऱ्या चित्रपटांचा इतिहास जब्बार या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही’. अशी भावना विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.
आळेकर म्हणाले, ‘जब्बारबरोबर ५० वर्षांची मैत्री आहे. महाविद्यालय असो की नाटक, आमचा म्होरक्या म्हणजे जब्बार पटेल! घाशीराम कोतवाल नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला त्या दिवशी, म्हणजे ६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर जब्बारने कोणतेही नाटक केले नाही. रंगभूमीवर मोजकेच, तरी सर्वोत्तम काम त्याने केले’.
रंगमंच ही दिसायला एवढीशी जागा असली, तरी तिची ताकद विलक्षण आहे. पुण्यात वाढलो. प्रचंड प्रेम मिळाले, त्या प्रेमाची जबाबदारी आणि दडपणही मोठे होते. मी नाटक करत नाही अशी तक्रार मित्र करतात. मात्र जे करावे ते सर्वोत्तम ही नीतिमत्ता भालबा केळकर आणि डॉ. श्रीराम लागू यांसारख्या व्यक्तिमत्त्वांकडून मिळाली. ज्या व्यक्तींबरोबर आपण राहतो, ती आपल्याला घडवतात. अशी माणसे ही माझी शिदोरी आहे, अशी भावना डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
