🕒 1 min read
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. ही कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी याची माहिती अर्नब गोस्वामीला कशी मिळाली? त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
तर, अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे Official Secrets Act, 1923, Sec. 5 नुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे तर आहेच पण हा देशद्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवार दि. २२ जानेवरी रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, गोस्वामी याला देशाच्या सुरक्षेसंदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती कोणी दिली? त्याने ती माहिती आणखी किती लोकांना दिली? केंद्र सरकारमधील कोण महत्त्वाच्या व्यक्ती अर्नब गोस्वामीला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवत आहेत का? अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची सॅटेलाईट फ्रिक्वन्शी बेकायदेशीर वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसै न देता त्यांच्या फ्रिक्वन्सी वापरणे हा गुन्हा आहे. टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. दूरदर्शनने माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली असता राठोड यांनी ती तक्रार बाजूला ठेवली असे या संभाषणात दिसून येत आहे. याचाच अर्थ मोदी सरकारचा गोस्वामीला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळेच जनतेचा पैसा लुबाडणा-या अर्नब गोस्वामीविरोधात केंद्र सरकारने कठोर कारवाई केली नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या व्हॉट्स अप चॅटवरून अर्नब गोस्वामी यांचे पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांशी अत्यंत निकटचे संबंध आहेत असे दिसते. अनेक मंत्री व उच्चपदस्थांनी त्याला नियमाच्या पलिकडे जाऊन व्यावसायिक मदत केली असल्याचे समोर येत आहे. त्यासोबतच पुलवामातील हल्ला हा मोठ्या व्यक्तीच्या फायद्याचा आहे तो निवडणूक जिंकेल असा उल्लेखही या चॅटमध्ये आहे. त्यामुळे भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी शहीद जवानांच्या बलिदानाचा वापर केला का? याचे उत्तरही केंद्र सरकारने दिले पाहिजे. असे थोरात म्हणाले आहेत.
अर्नब गोस्वामी आणि केंद्रातील भाजप सरकारचे साटेलोटे हा माध्यम स्वातंत्र्य आणि देशाची सुरक्षा आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणात एकटा अर्नब गोस्वामीच दोषी नाही तर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आपण घेतलेल्या शपथेचा भंग करून गोस्वामीचा व्यावसायिक फायदा करून दिल्याचे तसेच त्याला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणात गोस्वामीला मदत करणा-या उच्चपदस्थांवरदेखील तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी थोरात यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- विनापरवाना ऊसगाळप केल्याने उस्मानाबादमधील जयलक्ष्मी शुगर्सला 35 लाखांचा दंड
- शरद पवारांचा एक फोन आणि इंडियाचं विमान मुंबईत लँड
- ‘वाटले होते गड्या आपला गाव बरा, पण तुम्ही म्हणले पसारा भरा’, पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर
- …म्हणून अजूनही व्हॅनिटी व्हॅन मध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे
- गुड न्यूज : जिओने बदलला ‘ हा ‘ रिचार्ज प्लॅन…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
