मुंबई : देशात कोरोनामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजवले आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने हिंमत दाखवून धार्मिक स्थळांमध्ये असलेला पैसा देशाच्या हितासाठी वापरावा, असे म्हणत वंचित आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले.
ते म्हणाले की, या ठिकाणी सरकार दिसत नाही, कुठे आहे सरकार? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. बोलाचीच कढी आणि बोलाचा भात आहे.
जर आर्थिक तंगी असेल तर सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत,सरकारने हिंमत दाखवावी आणि सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असे आंबेडकर म्हणाले.
तसेच कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर ३०२चा गुन्हा दाखल करावा, असेही आंबेडकर म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

