मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार पासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून नवीन अटी व नियम लागू होण्याची शक्यता आहे. तर आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी ग्रीन झोन व ऑरेंज झोनमधील उद्योगधंदे सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, मालेगाव, औरंगाबाद या महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या भागात चौथा लॉकडाऊन शक्यता अधिक आहे. तर हे जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत. कारण, मुंबई आणि पुण्यातून इतर जिल्ह्यात गेलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.
यावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली. या बैठकीत ग्रीन आणि ऑरेंज झोन भागात औद्योगिक तसंच इतर व्यवहारांवर अधिक शिथिलता देण्याबाबत सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे या भागात उद्योग धंदे सुरू झाले तर राज्यापुढे आर्थिक समस्या वेगळ्या वाढू नये यासाठी याबाबत विचार करत असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चौथ्या टप्यातील लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी या टप्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. या लॉकडाऊनचे स्वरूप हे वेगळे असणार आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठका घेतल्या. नॉर्थब्लॉकमध्ये अमित शाह तब्बल पाच तास उपस्थित होते. या सर्व बैठकांना त्यांच्यासह गृहसचिव अजय भल्लाही उपस्थित होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये संपूर्णपणे नवे नियम बनवण्यात आले असल्याचं सांगण्यात आले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
